विसर्जन करताना माणिकवाडात ‘सेल्फी’ तिघांच्या जीवावर बेतली

0
12
वर्धा, दि. 15 – आष्टी (शहीद) तालुक्यातील माणिकवाडा येथील युवक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी तारासावंगा येथील कड नदीच्या पात्रात गेले. विसर्जन करताना त्यांना सेल्फीचा मोह झाला. अशातच तोल जावून चारजण पाण्यात बुडाले. यात तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर एकाचा वाचविण्यात यश आले. ही घटना  गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
हंसराज रमेश सोमकुंवर (२६), केवल सुरेश मसराम (२०) व चेतन गेंदराज नेहारे (१९) अशी मृतकांची नावे आहेत.  या घटनेने माणिकवाडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेतून पंकज खवशी हा सुदैवाने बचावला. तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. बचावलेल्या पंकज खवशी याने लगेच घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली.  तिघांनाही वाचविण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पाणी जास्त खोल असल्यामुळे यात यश आले नाही. यामध्ये त्या तिघांचाची करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास कानडे, ठाणेदार दिलीप ठाकूर, तारासावंगाचे सरपंच रत्नपाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.