डॉ.आंबेडकरांचा जीवनपट हा प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी – डॉ.विजय सूर्यवंशी

0
16

गोंदिया,दि.१४ : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत यशाची शिखरे गाठली. जगातील एक आदर्श संविधान त्यांनी देशासाठी लिहिले. प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. प्रत्येक क्षेत्रातील असलेले त्यांचे ज्ञान, कौशल्य व परिश्रम करण्याची तयारी असा एकूण त्यांचा जीवनपटच हा प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
आज १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेचे उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा.सविता बेदरकर, शुद्धोधन शहारे तर मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ.सूर्यवंशी याप्रसंगी पुढे म्हणाले, डॉ.आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठात ३ वर्ष शिक्षण घेत असतांना त्यांनी अर्थशास्त्राशी संबंधित २९ विषयांचा सखोल अभ्यास केला. भारतीय रिजर्व्ह बँकेची स्थापना डॉ.आंबेडकरांमुळेच झाली. त्याकाळी सावकारांविरुद्ध त्यांनी चळवळ उभी केली. स्त्रीयांना समान अधिकार व सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी काम केले.
प्रॉब्लेम ऑफ रुबी हे पुस्तक वयाच्या ३२ व्या वर्षी डॉ.आंबेडकरांनी लिहिल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, त्याकाळी अर्थशास्त्रातील एक विद्वान व्यक्ती म्हणून डॉ.आंबेडकरांची ओळख होती. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आज प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. संविधानाची निष्पक्षपातीपणे अंमलबजावणी करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.रामगावकर म्हणाले, समाजाच्या सर्वांगीण उद्धारासाठी डॉ.आंबेडकरांनी आपले आयुष्य वेचले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन व समाजाच्या कल्याणासाठी काम करुन त्यांनी आदर्श निर्माण केला. डॉ.आंबेडकरांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. प्रत्येकापर्यंत आज शिक्षण पोहचले आहे ते केवळ बाबासाहेबांमुळेच असेही ते म्हणाले.
श्रीमती बेदरकर म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बालवयापासून जातीयतेचे चटके सहन केले. बुद्धीवंतांच्या घरी बुद्धीवंत जन्माला येतो परंतू अस्पृश्याच्या घरी सुद्धा विद्वान जन्माला येतो हे डॉ.आंबेडकरांनी सिद्ध करुन दाखविले. त्यांनी पत्नी व मुलाकडे दुर्लक्ष केले परंतू समाजाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी खुप मोठा त्याग केला. महिलांना संपत्तीचा अधिकार मिळवून दिला. नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसुती रजा बाबासाहेबांमुळेच मिळाल्याचे त्यांनी सांगितले.श्री.शहारे म्हणाले, डॉ.आंबेडकर हे केवळ दलितांचेच नेते नव्हते तर देशाचे नेते होते. बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार-प्रसार पाहिजे तसा झाला नसल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, भारतीय संविधान आजही देशातील लोकांना कळले नाही. त्यामुळे समाजात संघर्ष होत असतो. संविधानाची आजही प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त करुन श्री.शहारे पुढे म्हणाले, समाजातील कमजोर वर्गावर आजही अन्याय-अत्याचार होत आहे. शाहू महाराजांनी कमजोर वर्गाच्या कल्याणासाठी खुप कष्ट घेतले. संविधानातील प्रत्येक कलमांची माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकातून सहायक आयुक्त वानखेडे यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, वसतीगृह योजना, निवासी शाळा, आर्थिक, शैक्षणिक लाभाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी समतादूत किशोर मलेवार व सतीश शामकुवर यांनी कवितेचे वाचन केले.कार्यशाळेला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन रवी बरके यांनी केले. उपस्थितांचे आभार मिलींद रामेटके यांनी मानले.