भटक्या समाजातील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवा- राजकुमार बडोले

0
16

गोंदिया,दि.२६ : शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या मांग गारुडी, बहुरुपी, नाथजोगी व भिंगी या भटक्या समाजातील नागरिकांचे प्रश्न संबंधित जिल्हा प्रशासनाने तातडीने सोडवावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
२४ ऑगस्ट रोजी नवेगावबांध येथील लॉगहट विश्रामगृह येथे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील भटक्या समाजातील नागरिकांच्या समस्यांच्या आढावा बैठकीत श्री.बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, भंडारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जि.प.उपाध्यक्ष श्रीमती रचना गहाणे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
श्री.बडोले पुढे म्हणाले, भटक्या समाजाला कुठेतरी स्थायी केले पाहिजे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. या समाजातील महिलांना वसंतराव नाईक महामंडळामार्फत गृह उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करावे. त्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न देखील मार्गी लावले पाहिजे.
पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व कोतवाल यांचा स्थानिक चौकशी अहवाल प्राप्त करुन त्यांच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्यात यावा असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, हा भटका समाज घरे नसल्यामुळे कापडी पालाचे घरे तयार करुन राहतो. त्यांच्या पालावरच्या शाळाअंतर्गत पालावर जावून विद्यार्थ्यांना दोन तास शिकविण्यात यावे. यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच त्यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत सौर कंदील दिले पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच त्यांच्या वन जमिनीच्या पट्टयांबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा असेही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या समाजाच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांच्या समस्या लवकरच सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.
भंडारा जिल्हाधिकारी डॉ.चौधरी म्हणाले, या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच कृती आराखडा तयार करुन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला गोंदिया जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी सर्वश्री सुनिल सूर्यवंशी (तिरोडा), सिध्दार्थ भंडारे (अर्जुनी/मोर), के.डी.मेश्राम (गोंदिया), मोहन टोनगावकर (देवरी), गोंदिया तहसिलदार सर्वश्री अरविंद हिंगे, रविंद्र चव्हाण, साहेबराव राठोड, कल्याणकुमार डहाट, प्रशांत सांगडे, विठ्ठल परळीकर, संजय नागटिळक, भंडारा जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी सर्वश्री डॉ.संपत खिल्लारी, शिल्पा सोनाळे, दिलीप तलमले, तहसिलदार सर्वश्री संजय पवार, राजीव शक्करवार यांचेसह अन्य तहसिलदार उपस्थित होते. यावेळी गोंदिया समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, भंडारा समाज कल्याणचे सहायक आयुक्त देवसूदन धारगावे, वसंतराव नाईक महामंडळाचे अधिकारी, भटक्या जमाती संघटनेचे अध्यक्ष श्री.चव्हाण उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक दिलीप चित्रीवेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवा कांबळे यांनी मानले.