अवयवदानामुळे दुसऱ्यांना जीवन जगण्याची संधी – डॉ.विजय सूर्यवंशी

0
22

अवयवदान अभियानाचा समारोप
गोंदिया,दि.१ : मानवाला डोळे, यकृत, हृदय व मुत्रपिंड यासारख्या अवयवांची दिलेली अवयवरुपी भेट ही मृत्यूनंतरही दुसऱ्या गरजू रुग्णांना दान करता येवू शकते व मृत्यूच्या क्षणावर असलेल्या रुग्णांना अवयवदानामुळे दुसरे जीवन जगण्याची संधी मिळू शकते. असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. आज १ सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे महाअवयवदान अभियानाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.सूर्यवंशी बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, प्रा.डॉ.व्ही.पी.रुखमोडे, प्रा.डॉ.मकरंद व्यवहारे, डॉ.सुगन, जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, अवयवदानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी राज्यात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत महा अवयवदान अभियान राबविण्यात आले. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मरावे परी अवयवदानारुपी उरावे असेच म्हणावे लागेल. मृत्यूनंतर आपल्या शरीरावर आपला काहीच अधिकार राहत नाही, तो मातीमोल असतो. परंतू अवयवदानामुळे आपण मृत्यूनंतरही एका नवीन व्यक्तीला जीवनदान देवू शकतो असेही त्यांनी सांगितले.
गोंदिया जिल्हा निसर्गसंपन्न असल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात वनसंपदा व जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. आपल्या कारकिर्दीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले याचा आपल्याला अभिमान असून या महाविद्यालयाचे जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.अजय केवलीया व डॉ.देवेंद्र पातुरकर यांनी शासनाकडून महा अवयवदान अभियान राबविण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली व त्याचे महत्व पटवून दिले व मृत्यूनंतर प्रत्येकाने अवयवदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अवयवदान महान कार्य या विषयावरील व्याख्यानातून डॉ.मकरंद व्यवहारे, डॉ.सुगन व श्री.जैन यांनी मार्गदर्शन केले. महा अवयवदान निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या गोंदिया शहरातील निर्मल इंग्लिश हायस्कूल, मनोहर म्युन्सीपल हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज, मारवाडी विद्यालय, एस.एस.गर्ल्स कॉलेज, जे.एम.ज्युनियर कॉलेज, डी.बी.सायंस कॉलेज, एस.एस.ए.एम.गर्ल्स हायस्कूल व श्रीमती सरस्वतीबाई महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला डॉ.सुरेखा मेश्राम, डॉ.तोटे, डॉ.श्रीखंडे, डॉ.जयस्वाल, यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, गोंदिया शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ.संगीता भलावी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.प्रवीण जाधव यांनी मानले.