शेतकऱ्यांना समृध्द करण्याचा प्रयत्न- पालकमंत्री बडोले

0
8
????????????????????????????????????

सालेकसा,दि.२६ : मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ११ हजार ९५ कोटी रुपयांची राज्यातील शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेतून अपुर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. शेतीशी संबंधित असलेल्या विविध योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना देवून त्यांना समृध्द करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सालेकसा तालुक्यातील सलंगटोला येथे आज २६ मे रोजी आयोजित शिवार संवाद सभेत उपस्थित शेतकऱ्यांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, भाजपाचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, माजी जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता पुराम, माजी पं.स.सभापती बाबुलाल उपराडे, माजी पं.स.सदस्य संगीता शहारे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री.बहेकार यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, राज्य शासन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांची कर्जफेड शासनाने केली असून उर्वरित ३१ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना पिक विम्याचे ६७३९ कोटी रुपये दिले आहे. २०१९ पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला असून यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यात येत आहे. शाश्वत सिंचनासाठी हे अभियान उपयुक्त ठरत आहे. या अभियानातून ५४४ कोटीची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे. १२ लाख ५१ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रासाठी एकवेळच्या संरक्षीत सिंचनाची सुविधा यातून निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. १०० एकर शेतीमध्ये गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार पुराम म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्याय विविध योजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत आहे की नाही याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम, घरकूल योजना, वीज कनेक्शन यासह अनेक बाबीवर शासनाने काम केल्याचे त्यांनी सांगितले. सलंगटोला येथे आयोजित शिवार संवाद सभेला गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.