चंद्रपूर,दि.10- महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित शहर म्हणून मूल शहराचे नाव आगामी काळात घेतले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मुल शहरात 33 कोटी रु किमतीच्या विवीध विकासकामांचे उदघाटन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. संध्या गुरनुले, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मुल शहर भाजपाचे अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगरसेवक विनोद सिडाम, सौ. रेखा येरणे, सौ. शांता मांदाडे, सौ. वनमाला कोडापे, प्रशांत समर्थ, सौ. विद्या बोबाटे, अनिल साखरकर, सौ. आशा गुप्ता, प्रशांत लाडवे, सौ. संगीता वाळके, सौ. वंदना वाकडे, महेंद्र करकाडे, मिलींद खोब्रागडे, प्रभा चौथाले, सौ. मनिषा गांडलेवार, चंद्रकांत आष्टनकर, अजय गोगुलवार आदी उपस्थित होते.
मूल शहरासाठी २४ तास पाणी पुरवठा करणा-या 28 कोटी रु किमतीच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ, अडीच कोटीच्या तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे भूमीपूजन, 3 कोटी 26 लक्ष रू किमतीच्या १० सार्वजनिक जागांच्या सौंदर्यीकरणाचा प्रारंभ अशा विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन आज मूल शहरात करण्यात आले होते. यावेळी पाणी पुरवठा योजनेसाठी पूरक ठरणा-या वीज मंडळाच्या एक्सप्रेस फिडरचे उदघाटन करण्यात आले.
मुल शहरात सुमारे 150 कोटी रू. किंमतीच्या विकासकामांना मंजूरी मिळाली असुन यात प्रामुख्याने मुख्य मार्गाच्या सिमेंटीकरणासह तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, चौक सौंदर्यीकरण, स्मशानभूमी बांधकाम, पाणी पुरवठा योजना, बस स्थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरण, वळण मार्गाचे बांधकाम, माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांचे स्मारक व सभागृहाचे बांधकाम, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, खनिज विकास निधीच्या माध्यमातुन इको पार्कचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, शासकीय आदिवासी मुलींच्या व मुलांच्या वसतीगृहाचे बांधकाम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम, क्रिडा संकुलाचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अतिरिक्त कार्यशाळेचे बांधकाम, सीसी टिव्ही सर्व्हेलन्स सिस्टीम, माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, भूमीगत विद्युत वाहिनीचे बांधकाम आदी विकासकामे मुल शहरात मंजूर करण्यात आली असुन यातील बहुतांश विकासकामे प्रगतीपथावर आहेत व काही पूर्णत्वास आली आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.