पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वयंचलित हवामान केंद्राचे उदघाटन

0
9

३३ महसूल मंडळात होणार हवामान केंद्र
१२ कि.मी.परिसरातील मिळणार अचुक हवामान नोंदणी
आपत्ती व्यवस्थापनास उपयुक्त
विकासाच्या योजना राबविण्यास ठरणार सहाय्यभूत
गोंदिया,दि.१ : कारंजा येथील कृषि चिकित्सालयात आज १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हवामानाचा वेध घेणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, आत्माचे उपसंचालक श्री.सराफ, तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांची यावेळी उपस्थिती होती.
हवामानाची अचुक माहिती या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे मिळणार आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना नैसर्गीक आपत्तीचा सामना करावा लागते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट, अवकाळी पावसामुळे होणारे पिकांचे नुकसान होते. या नैसर्गीक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. हे नुकसान टाळण्यासाठी हे स्वयंचलित हवामान केंद्र उपयुक्त ठरणार आहे. सोबतच अचुक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या माहितीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान विषयक घटकांची माहिती वेळीच उपलब्ध होणार आहे. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे माहिती देण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.
या हवामान केंद्रामुळे १२ किलोमीटर परिसरातील अचुक हवामानाची नोंद दर १० मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. या हवामान नोंदीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप करण्यात येणार आहे. जमा झालेली हवामान विषयक माहिती पीक विमा योजना, पीक विषयक सल्ला, हवामान विषयक संशोधन व इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषि विभाग व स्कायमेट वेदर सर्व्हीसेस यांच्या संयुक्त भागीदारीतून स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात हे स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषि हवामानाचा सल्ला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यास महत्वाचा ठरणार आहे. तसेच नैसर्गीक आपत्तीची पूर्वकल्पना व आपत्ती व्यवस्थापनास देखील हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. या उदघाटन कार्यक्रमाला कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.