तृतीयपंथींना विधान परिषदेत आरक्षण देण्याची मागणी

0
7

नागपूर दि.२२:: तृतीयपंथी हा दुर्लक्षित, मागासलेला वर्ग आहे. सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथींना तिसरा दर्जा दिला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाच्यावतीने तृतीयपंथींना कोणत्याच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसल्यामुळे किन्नर सर्व समाज विकास संस्थेच्यावतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडविला. मोर्चात सहभागी तृतीयपंथींनी जोरदार नारेबाजी करून आपल्या मागण्या रेटून धरल्या. त्यानंतर उत्तम बाबा सेनापती, चमचम गजभिये, विद्या कांबळे, देबोजान, संजीवन वालदे यांच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनातील मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्यानंतर या मोर्चाची सांगता झाली. तृतीयपंथींना विधान परिषदेत आरक्षण द्यावे, शासकीय कागदपत्रांवर स्त्री/पुुरुष या प्रमाणे तृतीयपंथींचा उल्लेख असावा, शासकीय योजनांचा लाभ द्यावा, कला, व्यवसाय, विविध क्षेत्रात आरक्षण द्यावे, तृतीयपंथींची ओळख अभ्यासक्रमातून करून द्यावी आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्व उत्तम बाबा सेनापती, चमचम गजभिये, विद्या कांबळे आदींनी केले.