पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये- अभिमन्यू काळे

0
15

१ लाख बालकांना देणार पोलिओ डोस

२८ जानेवारीला पोलिओ लसीकरण
गोंदिया,दि.१० : देशाची भावी पिढी असलेल्या पाच वर्षाच्या आंतील सर्व बालकांना पोलिओ लसीकरण करावे. जिल्ह्यातील कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नुकतीच पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी काळे बोलत होते. जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराव पारखे, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.राज पराडकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
रविवारी २८ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील १ लाख ६ हजार ११४ बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ८५४५९ आणि शहरी भागातील २०६५५ बालकांचा समावेश आहे. सदर दिवशी बुथवरील लसीकरणानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस घरभेटीतून लसीकरणातून सुटलेल्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे.जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक गावात, टोले, वाडे, शाळेत, आंगणवाडी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.सन १९९५ पासून राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्यात येते. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा दक्षतापूर्वक काम करीत आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जिल्हा समन्वय समितीच्या सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सादरीकरण उपसंचालक आरोग्य सेवा नागपूरचे प्रतिनिधी डॉ.साजीद व जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी केले. सभेचे संचालन आरोग्य सहायक ए.एस.वंजारी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी मानले.