नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार, एक जखमी

0
9

नागपूर,दि.16: भरधाव कार उभ्या कंटनेरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा करुण अंत झाला. तर, त्यांचे तीन मित्र गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास नागपूर अमरावती महामार्गावर वाडी-वडधामन्याजवळ हा भीषण अपघात घडला. अपघातात ठार झालेल्यांमध्ये येथील गुन्हे शाखेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमूख राजेंद्र निकम यांची मुलगी निशा (वय २४) हिचाही समावेश आहे.
पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिस्लॉप कॉलेजचे विद्यार्थी निशा राजेंद्र निकम (२१), विशाल रथवानी (२१), सत्या सिंग (२०), दिव्या पकू (२१), धिरज पथाडे (२१), मैत्रेय आवळे (२२), शाहबाज जाफर अलवी (२२) आणि ईव्हाना परवीन खान (वय २२) अमरावतीकडे पार्टीसाठी गेले होते. दुपारी ४.३० च्या सुमारास ते तिकडून अर्टिका कार (एमएच ४०/ एसी ९२०१) ने नागपूरकडे परत येत होते. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. धावत्या कारमध्ये ते गंमतजंमत करत येत होते. वडधामनाजवळच्या शहनाज हॉटेलसमोर अचानक भरधाव कार उभ्या कंटेनरवर आदळली. त्यामुळे कारच्या दर्शनी भागाची पुरती मोडतोड झाली आणि कारमध्ये बसलेले निशा, विशाल, सत्या, दिव्या तसेच धीरज हे पाच जण जागीच ठार झाले. तर, शाहबाज, ईव्हाना आणि मैत्रेय हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. शाहबाज आणि ईव्हाना यांना मेडीट्रीना तर मैत्रेयला वाडीच्या वेलट्रीट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.