टंचाई सदृश्य स्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही संधी- आयुक्त अनूप कुमार

0
6

गोंदिया,दि.९ : येत्या पाच वर्षात टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही एक चालून आलेली संधी समजून ग्रामस्थांनी या अभियानाला आपले अभियान समजून सहभागी व्हावे व हे अभियान यशस्वी करावे. असे आवाहन नागपूर विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.आज (ता.९) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित सभेत जलयुक्त शिवार अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, धडक सिंचन विहीर कार्यक्रमाचा आढावा घेतांना आयुक्त अनूप कुमार बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अपर आयुक्त हेमंत पवार, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) बकूल घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त अनूप कुमार पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यापासून आढावा बैठकीला सुरुवात केली आहे. या जिल्ह्याकडे दुर्लक्ष होऊ नये हा उद्देश असून या जिल्ह्याने अनेक प्रकल्प, योजनेत चांगले काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जलयुक्त शिवार अभियान हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. मोहीम स्वरुपात हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात या अभियानाची अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे. लोकसहभागावर हे अभियान अवलंबून आहे.
लोकांच्या मागणीनुसार माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती करण्यात यावी असे सांगून आयुक्त अनूप कुमार म्हणाले, यंत्रणांनी शेतकऱ्यांना तलावातील गाळाची उपयुक्तता पटवून दयावी त्यामुळे ते तलावातील गाळ शेतात टाकण्यास तयार होतील. गाळामुळे शेतातील पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. तलावातील गाळ काढल्यामुळे पाण्याची साठवण क्षमता देखील वाढणार आहे.
अनूप कुमार पुढे म्हणाले, जिल्ह्यात पाण्याचा वापर उपलब्ध सिंचन क्षमतेच्या २२ टक्के इतका आहे, तो वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजीपाला पिकात वाढ होण्यास मदत होईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचे योग्यप्रकारे नियोजन करुन जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबत विकासकामे करता येईल.
विशेष घटक योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांची निवड करावी असे सांगून ते म्हणाले, धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून त्यामाध्यमातून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करावा. आजपासून सुरु करण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना आणि अटल पेंशन योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाने काम करावे असेही आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात जिल्हा महत्वपूर्ण टप्प्यावर आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ३१६ कामे सुरु आहे. गावातील नागरिकांचा या अभियानात सहभाग वाढला असून ट्रॅक्टरद्वारे शेतात गाळ टाकण्याचे काम करण्यात येत आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात येत आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या वाढणार असून जलयुक्त शिवार अभियानामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अपर आयुक्त पवार यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. तांत्रिकदृष्ट्या जलयुक्त अभियानाचे योग्य नियोजन करावे असेही सांगितले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी जिल्ह्यात ९४ गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली असून मागील पाच वर्षात ज्या गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे अशा गावांची निवड या अभियानात करण्यात आल्याचे सांगितले. प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) बकूल घाटे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत, तर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पुराम यांनी धडक सिंचन विहिरी कार्यक्रमाबाबत माहिती दिली. सभेला अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती.